मुंबई : राज्य शासनाचा उद्योग विभाग व सीआयआयच्या वतीने वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.
वरळी येथील बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यासाठी परिसरातील सुमारे तीन हजार इच्छुकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणी केली होती. एकूण ६७ कंपन्यांची यासाठी नोंदणी झाली होती. त्यापैकी ५० कंपन्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. एक हजार ३९४ मुलांनी प्रत्यक्षात सहभाग नोंदवून मुलाखती दिल्या. त्यापैकी ७५५ जणांची प्राथमिक फेरीत निवड करण्यात आली. त्यातील १०४ जणांना जागेवर नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते निवड झालेल्या तरुण-तरुणींना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
‘उद्योग विभाग राबवत असलेल्या या उपक्रमाला सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळत असून, ही समाधानाची बाब आहे. या मेळाव्यात सहभागी झालेल्या प्रत्येक तरुण-तरुणीला नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल. प्रत्येकाला नोकरी देणे हे आमचे कर्तव्य आहे,’ असे देसाई यांनी या वेळी सांगितले.
वरळीचे आमदार सुनील शिंदे यांच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.